रझाकारांनी भग्न केलेले पुणतांब्याचे 'मामा भाचे मंदिर'
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक मंदिरांपैकी हे पुरातन मंदिर आहे. मंदिराचा जवळपास 300 ते 400 वर्षाचा इतिहास असल्याचे स्थानिक सांगतात. दोघे मंदिर अगदी शेजारी शेजारी आहेत. दोघी मंदिरे महादेवाची आहेत.
निजामी राजवटीत रझाकरांच्या क्रूर व धर्मांध आक्रमणात मंदिरांचा विध्वंस झाल्याचेही स्थानिक सांगतात. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे 70-80 वर्षांपूर्वी मंदिराचा झालेला विध्वंस अजूनही त्याचीच वाईट आठवण करून देत आहे. कारण या मंदिराचा मागील इतक्या वर्षात विकास सोडा सध्या भग्न मुर्त्या सुद्धा बदलता आलेल्या नाहीत. याला स्थानिक हिंदू समाजाची हतबलता म्हणावी की राजकीय उदासीनता? अनेक प्रयत्न करूनही राजकीय अनास्था असल्यामुळे हिंदू अस्मितेवर झालेला हा आघात पुसता आलेला नाही.
गोदावरीच्या तीरावर ब्राम्हणघाटावर आज जवळपास 12 ते 15 छोटी मोठी देऊळ आहेत. त्यापैकीच एक म्हणजे हे मामा-भाचे मंदिर. बाकी सर्व मंदिरे ही नंतरच्या काळात अगदी अलीकडे बांधलेली आहेत. पण येथील सर्वात मोठे व पुरातन मामा भाचे मंदिराकडेच का दुर्लक्ष झाले ते काही कळत नाही. बहिष्कृत केल्याप्रमाणे हे मंदिर आज जीर्ण अवस्थेत एकीकडे शेवटच्या घटका मोजत उभे आहे.
स्थानिक एका व्यक्तीने येथील थोडा इतिहास सांगितला. आर्थिक सुबत्ता असलेले हे पुणतांबा गाव. गावात जिकडे तिकडे तांब्याचाच मोठ्या प्रमाणात वापर असल्याने या गावाचं नाव पुणतांबे पडले. ब्राम्हण समाज इथे मोठ्या संख्येने रहिवास करत होता. गोदावरीच्या तीरावर दररोज सव्वा मण सोनं घासलं जात, इतकी येथील सुबत्ता होती अशी माहिती मिळाली.
एके दिवशी पहिलवान असलेल्या मामा भाच्यानी एकमेकांना द्वंदाचे आव्हान केले. या कुस्तीत दोघेही मरण पावले. शेवटची इच्छा म्हणून त्यांनी इथे त्यांची समाधी व महादेवाचे देऊळ बांधायला सांगितले. त्यांच्या आठवणीत ही दोघे मंदिर उभारली गेली. परंतु रझाकारांनी या मंदिराचा विध्वंस केला व देवाच्या मुर्त्या फोडल्या. त्यात अजूनही सुधारणा न होता तश्याच भग्न मुर्त्या व जीर्ण मंदिर काळजाला वेदना देऊन जातात. मंदिराच्या समोरच मामा भाचे यांची समाधीही आहे.
या ब्राम्हण घाटावर श्राद्ध व उत्तरक्रिया विधी होतात. शेजारीच शनी मंदिर, हनुमान मंदिर, महादेव मंदिर, श्री विष्णूचे मंदिर, देवीचे मंदिर अशी बरीच मंदिर आहेत. दररोज शेकडो भाविक याठिकाणी दर्शन घेतात.
इथून थोड्याच अंतरावर चांगदेव महाराज समाधी मंदिर आहे. या मंदिराचा चांगला विकास झाला आहे. चांगले बांधकाम आहे. अलीकडे कार्तिक स्वामी मंदिर सुद्धा आहे. त्याचाही चांगला विकास असल्याचे दिसते. तिघे ठिकाणी ब्राम्हण घाट, विठ्ठल घाट व अहिल्याबाई होळकर घाट असे नावं आहेत. अहिल्याबाई होळकर घाटाचा विकास अहिल्याबाई होळकर यांच्या कारकिर्दीत केला गेला आहे.
गोदामाईच्या सानिध्यात रम्य वातावरणात ही धार्मिक केंद्र मन प्रसन्न करतात. मामा भाचे मंदिरच काय ते मनाला चटका लावून जाते.
©️ कल्पेश गजानन जोशी
ईमेल - Kavesh37@yahoo.com
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा